राज्याच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण; ५० वर्षे जुने सेवा प्रवेश नियम बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनातून महाघोषणा
लाल 🚨 दिवा-आपला विशेष प्रतिनिधी-मुंबई, दि. ४ ऑक्टोबर, २०२५:राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांसाठी आशेचा किरण घेऊन आलेली एक अभूतपूर्व घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आगामी २०२६ हे वर्ष ‘मेगाभरतीचे वर्ष’ म्हणून ओळखले जाईल, अशी ग्वाही देतानाच, तब्बल १०,३०९ उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे देऊन सरकारने युवकांना सुखद धक्का दिला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला.
राज्याच्या प्रशासकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस ठरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत, अनुकंपा तत्वावरील आणि लिपिक संवर्गातील तरुणांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. “शासकीय सेवेतील नियम ५० वर्षे जुने आहेत. लिपिकापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या कामाचे स्वरूप बदलले आहे, त्यामुळे आता या नियमांमध्ये आमूलाग्र बदल अटळ आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
शहीद कन्येला न्याय, एक भावुक क्षण!
या कार्यक्रमातील एक क्षण सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची कन्या अनुष्का मोरे हिला तब्बल १७ वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळाला. बी-फार्म झालेल्या अनुष्काला नियमांच्या अडथळ्यांमुळे ‘औषध निर्माता गट ब’ पदावर नियुक्ती मिळत नव्हती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) नियमात विशेष शिथिलता मिळवली आणि अनुष्काच्या हाती नियुक्तीपत्र सोपवले. “शहीदांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे सांगताना मुख्यमंत्री स्वतः भावुक झाले होते.
पारदर्शकतेचा नवा अध्याय – फडणवीस
मुख्यमंत्री म्हणाले, “भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसेल, तर प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होतो. म्हणूनच आम्ही IBPS आणि TCS सारख्या नामांकित संस्थांमार्फत परीक्षा घेऊन सुमारे १ लाख तरुणांना नोकरी दिली आहे. आता MPSC ची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे. २०२६ मध्ये रिक्त पदांचा डोंगर आम्ही उपसून काढणार आहोत.”
नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संदेश देताना ते म्हणाले, “तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही. तुमच्या कामामुळे किमान १० टक्के लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले, तर तुमच्या नोकरीचे सार्थक झाले समजा.”
हा ऐतिहासिक दिवस – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दिवसाला ‘ऐतिहासिक’ संबोधले. ते म्हणाले, “प्रत्येक फाईलमागे एक जिवंत माणूस असतो, हे विसरू नका. पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्ठा या तीन तत्वांवर काम करा. पंतप्रधान मोदींच्या ‘विकसित भारत’ स्वप्नासाठी ‘विकसित महाराष्ट्र’ घडवा.”
राज्यातील नियुक्तीचा लेखाजोखा
कोकण विभाग: ३,०७८ (सर्वाधिक)
विदर्भ: २,५९७
मराठवाडा: १,७१०
पुणे विभाग: १,६७४
नाशिक विभाग: १,२५०
या कार्यक्रमात पदभरती प्रक्रिया वेगाने राबवल्याबद्दल सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्तेही नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या महाभरतीच्या घोषणेमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.







