विरोधकांच्याच कौतुकाने सरकार चक्रावले; फडणवीसांच्या पोलिसांना राऊतांचे अनपेक्षित ‘प्रमाणपत्र’!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१३:- विशेष प्रतिनिधी:राजकारणाची समीकरणे क्षणात कशी बदलू शकतात, याचाच प्रत्यय आज महाराष्ट्राने घेतला. रोज सकाळी सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे आणि सत्ताधाऱ्यांवर बोचऱ्या शब्दांत प्रहार करणारे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील नाशिक पोलीस दलाच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. नाशिकला ‘कायद्याचा बालेकिल्ला’ बनवणाऱ्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या ‘कर्णिक पॅटर्न’वर त्यांनी स्तुतिसुमने उधळल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे.
नाशिक शहरात वाढलेली गुन्हेगारी, टोळीयुद्ध आणि अवैध धंद्यांवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक केला आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे, अवैध अड्डे जमीनदोस्त करणे आणि सराईत गुन्हेगारांची शहरातून हद्दपारी अशा धडक कारवायांमुळे गुन्हेगारी जगताचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या याच आक्रमक आणि परिणामकारक कारवाईला ‘कर्णिक पॅटर्न’ म्हणून ओळखले जात आहे.
राऊतांच्या कौतुकानेच सरकार ‘मात’!
या धडक कारवाईवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “नाशिकमध्ये पोलीस आयुक्त चांगले काम करत आहेत. जर कोणी गुन्हेगारांवर कारवाई करत असेल, तर पक्षाच्या पलीकडे जाऊन त्याचे स्वागत केले पाहिजे.” राऊतांच्या या अनपेक्षित खेळीने सरकारची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. ज्या कारवाईचे श्रेय सरकार घेण्याच्या तयारीत होते, त्याच कारवाईला आता प्रमुख विरोधकाकडून ‘प्रमाणपत्र’ मिळाले आहे. यामुळे आता जर ही कारवाई थांबली किंवा त्यात थोडी जरी ढिलाई आली, तर ‘आम्ही कौतुक करताच सरकारने कारवाई थांबवली,’ असा थेट आरोप करण्याची आयती संधी राऊतांच्या हाती आली आहे. राऊतांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत; एकीकडे चांगल्या कामाचे कौतुक करून आपली प्रतिमा उंचावली आहे, तर दुसरीकडे सरकारलाच पेचात टाकले आहे.
फडणवीसांचा आक्रमक पवित्रा आणि त्याला राऊतांनी दिलेला अनपेक्षित पाठिंबा, यामुळे नाशिकमधील ही मोहीम आता केवळ पोलीस कारवाई राहिलेली नाही, तर ती एक राजकीय ‘लिटमस टेस्ट’ बनली आहे. या ‘कर्णिक पॅटर्न’मुळे नाशिक खरोखरच गुन्हेगारीमुक्त होणार का आणि या अनपेक्षित कौतुकामागे राऊतांचे कोणते राजकीय गणित दडले आहे, याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.







