मराठी अस्मितेचा अपमान भोवला; खासदार निशिकांत दुबेंना नाशिक कोर्टाचे समन्स, हजेरीसाठी थेट नाशिकला यावेच लागणार!
लाल 🚨 दिवा-नाशिक,५:नाशिक: ज्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच गळ्याला आता कायद्याचा फास आवळला आहे! “मराठी माणसाला पटक पटक मारेंगे” असे विषारी उद्गार काढून देशभरात खळबळ माजवणाऱ्या झारखंडच्या खासदार निशिकांत दुबे यांना अखेर नाशिकच्या रणमैदानातून आव्हान मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रणझुंजार शहरप्रमुख सुदामा कोंबडे यांनी पेटवलेल्या या स्वाभिमानाच्या मशालीची धग आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचली असून, नाशिकच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दुबे यांना थेट समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे.
काय आहे थरारनाट्य?
काही दिवसांपूर्वी खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या खासदारकीच्या मस्तीत मराठी माणसांविषयी अत्यंत हीन आणि चिथावणीखोर विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा वणवा पेटला. मराठी माणसाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मनसेने कंबर कसली. केवळ रस्त्यावरचा लढाच नव्हे, तर कायदेशीर लढाईतूनही धडा शिकवण्याचा निर्धार मनसेने केला.
मनसेचा एल्गार, न्यायालयात रणशिंग फुंकले!
नाशिकचे मनसे शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुदामा कोंबडे यांनी हा अपमान उरात बाळगून थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. @विधीतज्ञ ॲड. मनुजा पिंगळे यांच्या तीक्ष्ण युक्तिवादाने सज्ज होऊन त्यांनी खासदार दुबे यांच्या विरोधात नाशिक न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत दुबे यांच्या वक्तव्यामुळे केवळ मराठी माणसांचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, सामाजिक सलोख्याला नख लावण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दुबे यांना शिक्षा ठोठावण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयाचा हातोडा, दुबेंची बोलती बंद?
या याचिकेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिकच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दुबे यांच्या विरोधात समन्स जारी केले आहे. याचाच अर्थ, आता खासदार निशिकांत दुबे यांना आपला सर्व बडेजाव सोडून झारखंडमधून थेट नाशिकच्या न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे.
“हा लढा केवळ माझा नाही, तर साडेबारा कोटी मराठी जनतेच्या स्वाभिमानाचा आहे. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसालाच मारण्याची भाषा करणाऱ्यांची मस्ती आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही. कायद्याच्या मार्गानेच त्यांना नाशिकच्या मातीत आणून जाब विचारू!”
- – सुदामा कोंबडे, याचिकाकर्ते तथा शहरप्रमुख, मनसे
या प्रकरणामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष नाशिककडे लागले आहे. दिल्लीच्या राजकारणात मुजोरीची भाषा करणारे खासदार दुबे नाशिक न्यायालयाच्या समन्सला कसे सामोरे जातात आणि या न्यायालयीन लढाईत मराठी अस्मितेचा विजय होतो का, हे पाहणे आता निर्णायक ठरणार आहे.







