लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.११:-विशेष प्रतिनिधी, नाशिक / मुंबई:राजकीय मैदानात शड्डू ठोकून, छाती फुगवून आणि “मी कुणालाही भीत नाही” अशा थाटात गुरगुरणारे गोकुळ गीते अखेर नरेंद्र दराडेंच्या ‘राजकीय चक्रव्यूहात’ पुरते अडकले आहेत. कालपर्यंत ज्यांच्या डरकाळीने विरोधी छावणीत थरकाप उडत असल्याचा दावा केला जात होता, त्या ‘वाघाचा’ सूर काल अचानक नरमला आणि त्याचे रूपांतर ‘मांजरीच्या म्याव म्याव’मध्ये झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले.
विधान परिषदेच्या या हायव्होल्टेज रणसंग्रामात ‘गोकुळ गीतां’चे सूर अखेर दराडेंच्या तालावर फिरले. कालपर्यंत शिंगावर घेण्याची भाषा करणारे गोकुळराव अचानक नरेंद्र दराडेंच्या दारात अत्यंत सुशिल आणि समजूतदार मुलासारखे उभे राहिले. हे पाहून राजकीय वर्तुळात आता एकच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे – “हा स्वाभिमान गहाण ठेवलेला सोहळा होता की एखाद्या ‘गुळचट’ तडजोडीचा गोड शेवट?”
नांगी टाकली की नांगी छाटली?
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गोकुळरावांनी दराडें समोर येताच जी काही ‘नमती भूमिका’ घेतली, ती पाहून स्वतः दराडे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला असावा. कालपर्यंत हवेत तलवार फिरवणारे हात आज दराडेंच्या चरणी लीन झाल्यासारखे वाटत होते. राजकीय चाणक्य आता विचारत आहेत की, ‘वाघाने स्वतःहून मांजर होणे पसंत केले’ की ‘पडद्यामागून कोण्या जादूगाराने त्याची नखे छाटली’?
सूत्रांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार, ही केवळ शरणागती नाही, तर या मागे ‘दे-घे’चा मोठा खेळ रंगल्याची दाट शक्यता आहे. “तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना” अशा या नव्या मैत्रीची गोड फळे कोणाला चाखायला मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मतदारांनी मात्र पॉपकॉर्न खात या ‘व्याघ्रनाट्याचा’ आणि वाघाच्या या नव्या ‘शाकाहारी’ रूपाचा मनमुराद आनंद घ्यावा!






